नागपूर : ‘भाऊसाहेब फुंडकर यांच्या जाण्याने केवळ भाजपचेच नव्हे, तर राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,’ असे विचार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शोकप्रस्तावावर चर्चा झाली. त्यावेळी शोकप्रस्तावावर विचार व्यक्त करतानाच मुंडे यांनी भाऊसाहेबांना आदरांजली वाहिली.
‘भाऊसाहेबांनी आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी संघर्ष केला आणि जेव्हा शेतकऱ्यांसाठी काही करण्याची संधी मिळाली त्याचवेळी नेमके ते सोडून गेले. अजातशत्रू व्यक्तिमत्त्व आज काळाच्या पडद्याआड गेले आहे. भाऊसाहेबांचे नेतृत्व हे खऱ्याअर्थाने शेतकऱ्यांचे नेतृत्व होते. भाजपचे कर्मठ कार्यकर्ते म्हणून त्यांची जास्त ओळख होती. त्यांनी आणि स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेसाहेबांनी ग्रामीण भागात खऱ्या अर्थाने भाजप पोचवली’ असेही मुंडे म्हणाले.
भाऊसाहेबांनी भाजपसाठी आयुष्य वेचले. सत्ता आल्यानंतर पहिल्यावेळी मंत्रीपद मिळू शकले नाही; मात्र त्यांनी कधी नाराजी दाखवली नसल्याचे मुंडे यांनी सांगितले.